सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!
संपादक- मधुकर बनसोडे
सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश, दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा आणि त्यातून निर्माण झालेला अविश्वास या सगळ्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात दरी निर्माण होताना दिसत आहे.
हॉटेल चालकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेत, बदनामीकारक संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र नागरिकांचा सरळ सवाल आहे जर सर्व काही व्यवस्थित असेल, तर अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत तपासणी आणि अहवाल तत्काळ जाहीर का होत नाही?
अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत अन्नभेसळ हा गंभीर गुन्हा आहे. राज्यातील विविध भागांत यापूर्वी तपासणीत दोष आढळल्यास परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच नागरिकांची अपेक्षा स्पष्ट आहे —अफवा असो वा सत्य, प्रशासनाने पारदर्शक तपासणी करून भूमिका मांडावी.
मात्र सध्यातरी संबंधित विभागाकडून अधिकृत निवेदन नसल्याने प्रश्न अधिकच गडद होत आहेत.
तपासणी झाली आहे का?
नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत का?
अहवाल येण्यास किती वेळ लागणार?
ही माहिती सार्वजनिक का होत नाही, असा सवाल खवय्ये उपस्थित करत आहेत.
विश्वास पुनर्स्थापित करण्याची गरज
केवळ पोलिसांत तक्रार देऊन प्रश्न सुटणार नाही. ग्राहकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी अधिकृत तपासणी अहवाल, पारदर्शक प्रक्रिया आणि स्पष्ट संवाद आवश्यक आहे. अन्यथा अफवा आणि संशय यांचे सावट कायम राहू शकते.
आज परिस्थिती अशी आहे की नागरिक गंभीर प्रश्न विचारत आहेत पण प्रशासनाकडून ठोस आणि स्पष्ट उत्तरांची प्रतीक्षा आहे.
आता निर्णयात्मक पाऊल कोण उचलणार?
सोमेश्वर परिसरातील जनतेचे लक्ष अन्न व औषध प्रशासन यांच्या येणार्या अहवालावर लागून राहिले आहे
