गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईट्सच्या वापरास जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध
प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या धामधुमीत जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका पूर्णपणे शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि शिस्तीत पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गणेशोत्सवाच्या कालावधीत लेझर लाईटच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.
आदेशाची व्याप्ती आणि कालावधी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उच्च क्षमतेच्या लेझर लाईट्सचा वापर करण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकाशझोतामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि तरुणांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच, या लेशेर लाईट्सच्या अतिप्रकाशामुळे चालकांचे नियंत्रण सुटणे किंवा मिरवणुकीत गोंधळ उडणे यांसारख्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
प्रशासाने घेतलेल्या या भूमिकेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा भंग करून जर कोणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करताना आढळले, तर संबंधित व्यक्ती, सार्वजनिक मंडळे किंवा संस्थांवर कारवाई केली जाईल. अशा कायदेभंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ मधील तरतुदींनुसार तसेच इतर प्रचलित कायदेशीर नियमांनुसार कठोर शिक्षेची आणि दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या मंडळ अडचणीत येऊ शकतात.
नागरिक आणि मंडळांकडून सहकार्याचे आवाहन
गणेशोत्सव हा आपला लाडका आणि आनंदाचा सण आहे. हा उत्सव उत्साहात पार पाडत असताना इतरांच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत योग्य असून, यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसेल. जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांना या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करून आपला लाडका गणेशोत्सव शांततापूर्ण, आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
