सहसंपादक अक्षय थोरात.
खांडज गावातून थेट बारामती शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की तो रस्ता आहे की नाही, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा खड्डेच अधिक दिसत असून, प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता मागील काही वर्षांत दुरुस्त करण्यात आला होता. मात्र अवघ्या एका वर्षाच्या आत पुन्हा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. यामुळे संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम नेमक्या कोणत्या दर्जाने केले, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच रस्त्याची ही अवस्था झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार, दूध उत्पादक तसेच रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवा वाहने ये-जा करतात. मात्र सध्याच्या स्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होण्याची भीती कायम आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असून, एखाद्या चालकाचे हात-पाय मोडण्याइतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी या रस्त्यावरून जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र प्रत्यक्षात ठेकेदारांकडून अपेक्षित दर्जाचे काम होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ठोस गॅरंटी घेण्यात यावी आणि कामाचा दर्जा तपासण्यासाठी तांत्रिक समिती नेमण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, हा रस्ता डांबरी न करता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. सिमेंट काँक्रीट रस्ता दीर्घकाळ टिकतो आणि वारंवार दुरुस्तीची गरज भासत नाही, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. आता हा रस्ता नेमक्या कोणत्या पद्धतीने आणि कधी दुरुस्त केला जाणार, याकडे खांडज ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.













