‘बर्ड फ्लू’ग्रस्त कोंबड्यांच्या सतत संपर्कात, अखेर कर्मचाऱ्यांचीच…

माझा जिल्हा

प्रतिनिधी

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूने संक्रमित साडेआठ हजार कोंबड्या मारण्यात आल्या. या संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील १५ कर्मचारी- अधिकाऱ्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली.

नागपुरातील शासकीय प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात स्थायी व कंत्राटी असे सुमारे १५ अधिकारी- कर्मचारी सतत कोंबड्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सगळ्यांची वैद्यकीय तपासणी केली. तुर्तास कुणामध्ये एकही लक्षण आढळले नाही. परंतु खबरदारी म्हणून काही दिवस या सर्व कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवणार आहे. त्यांच्यात पुढे काही लक्षणे दिसल्यास त्यांचे नमुने बर्ड फ्लू तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.

सदर शासकीय ‘कुक्कुट पालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले. चार मार्चला आलेल्या अहवालात या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने नियमानुसार संबंधित कुक्कुटपालन केंद्राचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्यात आले. सोबतच केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. तर या केंद्राच्या १ किलोमिटर परिघात येत असलेल्या पशुवैद्यकीय विद्यापीठाचेही कुक्कुटपालन केंद्र असून तिथल्याही २६० कोंबड्यांना मारण्यात आले. या वृत्ताला नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजूषा पुंडलिक यांनीही दुजोरा दिला. त्या लोकसत्ताशी बोलताना म्हणाल्या, या केंद्राच्या व्यतिरिक्त इतर एकाही भागात पक्षांमध्ये मरगळ आढळली नाही. परंतु, कुणीही घाबरण्याचे कारण नाही. या भागातील अंडी व कोंबडी खाणे पूर्णत: सुरक्षित आहे.

‘बर्ड फ्लू’ हा आजार एच ५ एन १ या विषाणूमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदक, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचे क्षेत्र वाढते तो माणसांमध्येही पसरू शकतो. परंतु माणसांना या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण खूपच कमी असते.