वर्गातील भांडणातून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

क्राईम

प्रतिनिधी

वर्गात झालेल्या भांडणातून दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका विद्यार्थ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र दहावीची परीक्षा देऊन दोन दिवसांपूर्वी आंबेगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरातील पीएमपी बस थांब्यावर विद्यार्थी आणि त्याचा मित्र गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी चौघेजण तेथे आले. वर्गात झालेल्या भांडणातून त्यांनी विद्यार्थी आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चौघांनी त्यांना मारहाण केली. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारण्यात आल्याने तो जखमी झाला. खासगी रुग्णालयात विद्यार्थ्याने उपचार घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार वाय. आर. खोडे तपास करत आहेत.