प्रतिनिधी.
मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज
*भोसरी, १५ ऑगस्ट २०२६ :* संपूर्ण भारत स्वातंत्र्यदिन , राष्ट्रभक्ती, अभिमान आणि उत्साहाने साजरा करीत असताना संत निरंकारी मिशनच्या वतीने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; अज्ञान, अहंकार आणि भेदभाव यांपासून मुक्त होऊन आत्मबोध आणि परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, हा संदेश या पर्वातून अधोरेखित करण्यात आला.
संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे आ. सखाराम लवटे (मुंबई) यांच्या सान्निध्यात सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत विशेष सत्संग सोहळा झाला. भोसरी, चाकण, राजगुरुनगर तसेच परिसरातील विविध भागांतून हजारो श्रद्धाळू या सोहळ्यास उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात झालेल्या सत्संगामुळे परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले होते.
सत्संगात ‘मुक्ती पर्वा’चा इतिहास, त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि सत्याच्या प्रचारासाठी जीवन समर्पित करणाऱ्या संत-महात्म्यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. ‘मुक्ती पर्व’ हा केवळ एक उत्सव नसून सत्य, सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या संत विभूतींचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस असल्याचे सांगण्यात आले.
सत्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविताना अनेक संत-महात्म्यांना प्रतिकूल परिस्थिती, विविध अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, सत्यावरील श्रद्धा, सद्गुरूंच्या चरणी असलेले समर्पण, सेवा आणि मानवतेचा भाव त्यांनी अखेरपर्यंत जपला. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत प्रेम, नम्रता, श्रद्धा आणि दृढनिश्चयाने सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले.
या पावन सत्संगात श्रद्धाळू भक्तांनी मानवतेला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करणाऱ्या महान संत विभूतींना श्रद्धापूर्वक नमन करून श्रद्धासुमने अर्पण केली. तसेच जगभरातील मिशनच्या विविध शाखांमध्येही ‘मुक्ती पर्वा’निमित्त विशेष सत्संगाचे आयोजन करून या महान संत विभूतींचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे, ‘मुक्ती पर्वा’ची सुरुवात १९६४ मध्ये जगत माता बुद्धवंती जी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ झाली. १९६९ मध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी यांच्या ब्रह्मलीन होण्यानंतर हा दिवस ‘शहनशाह-जगत माता दिवस’ म्हणून श्रद्धापूर्वक साजरा केला जाऊ लागला. पुढे १९७९ मध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान संत लाभ सिंहजी यांच्या स्मृतीचाही या दिवसाशी संबंध जोडण्यात आला तदुपरांत बाबा गुरबचन सिंहजी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ म्हणून प्रतिष्ठित केले. या प्रसंगी निरंकारी राजमाताजी यांच्या भक्तिमय जीवनाचा तसेच त्यांनी दिलेल्या अमूल्य शिकवणींचाही उल्लेख करण्यात आला.
२०१८ पासून युगनिर्माता माता सविंदरजी यांनाही या प्रसंगी श्रद्धापूर्वक नमन करण्यात येते. वात्सल्य, विनम्रता, त्याग आणि निःस्वार्थ सेवेने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन श्रद्धाळू भक्तांसाठी सदैव प्रेरणा, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत राहील. तसेच सत्गुरू माता जी यांनी हा पावन दिवस मिशन आणि मानवतेच्या सेवेसाठी तन, मन आणि जीवन निःस्वार्थ भावनेने समर्पित करणाऱ्या सर्व अनन्य भक्त आणि समर्पित सेवादारांप्रति कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करण्याचे एक सशक्त माध्यम बनविले.
निःसंशय, मुक्ती पर्वाचा मूलभूत संदेश हाच आहे की, ज्या प्रकारे भौतिक स्वातंत्र्य , राष्ट्राच्या प्रगती आणि उन्नतीचा मार्ग प्रशस्त करते, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देत प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनेच्या पवित्र मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देते.













