प्रतिनिधी
“जगाला भारताकडून अपेक्षा, गेल्या सहा वर्षांत संरक्षण निर्यातीत सात पटीने वाढ”
गलवान आणि तवांग घटनांमध्ये अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय लष्कराची प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली येथे भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की) च्या 95 व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. भारताचा इतर देशांच्या भूमीवर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नाही, परंतु कोणी वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. जगाच्या कल्याणासाठी काम करणारी महासत्ता बनण्याचे भारताचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. 2014 मध्ये मॉर्गन स्टॅन्लेने या गुंतवणूक आस्थापनेने तयार केलेल्या ‘फ्रेजाइल फाइव्ह’ मधून बाहेर पडून भारताने ‘फॅब्युलस फाइव्ह’ श्रेणीत प्रवेश केला आहे.
भारत आता जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी सरकारने केलेल्या प्रक्रियात्मक आणि संरचनात्मक सुधारणांवर प्रकाश टाकला. या सुधारणांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी ‘नव भारता’च्या दिशेने मोठी झेप घेण्यासाठी सज्जता केली आहे, असे ते म्हणाले.या सुधारणांनी अपेक्षित परिणाम दिले असून संरक्षण निर्यातीत गेल्या सहा वर्षांत सात पटीने वाढ झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संरक्षण उद्योगात विकासाची प्रचंड क्षमता आहे. म्हणूनच हा संरक्षण उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेचे सनराईज क्षेत्र ठरणार आहे,” असे ते म्हणाले.