प्रतिनिधी – फिरोज भालदार
स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना व ग्रामस्थ यांना कडक उन्हात बसावे लागल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी व शिक्षकांसह पालक व ग्रामस्थांसाठी उन्हापासून संरक्षणाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने अनेकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागल्याचे दिसून आले. विशेषतः लहान विद्यार्थ्यांना बराच वेळ उन्हात बसावे लागल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित राहणार हे प्रशासनाला आधीपासूनच माहीत असते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मंडप, सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि आवश्यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र नियोजनाअभावी उपस्थितांना उन्हाचा सामना करावा लागल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रीय सणाचा कार्यक्रम हा केवळ औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात पार पडणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामपंचायतीने कार्यक्रमाचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान पुढील काळात ग्रामपंचायतीने अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन करताना विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना उन्हात बसवन्याची वेळ पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.













