अनंत चतुर्दशीचा ‘ड्राय डे’ कायम; १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ नंतर मद्यविक्रीला परवानगी
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या सलग १२ दिवसांच्या दारूबंदीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने कडाडून विरोध केल्यानंतर प्रशासनाने महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या सुधारित आदेशानुसार, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी केवळ संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच दारूबंदी लागू असेल, त्यानंतर मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी असणारा ‘ड्राय डे’ पूर्णपणे कायम ठेवण्यात आला असून, त्या दिवशी पुण्यात दारू विक्री पूर्णपणे बंद राहील.
या वर्षीच्या गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या मुद्द्यासोबतच १२ दिवसांच्या दारूबंदीचा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. केवळ पुणे जिल्ह्यातच सलग १२ दिवस दारूबंदी लादण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत शेठना यांच्या खंडपीठाने अशा प्रकारच्या सरसकट दारूबंदी पद्धतीचा निषेध करत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले होते.
इतक्या लांबलेल्या दारूबंदीमुळे नियमित मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींना गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे अचानक रुग्णालयांमध्ये गर्दी वाढेल, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली होती. “सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे हा हेतू असू शकतो, पण मद्यप्राशन करणारी प्रत्येक व्यक्ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल असे मानणे चुकीचे आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईलच, लोकांना सण आनंदात साजरा करू द्या,” अशा शब्दांत न्यायालयाने प्रशासनाला सुनावले होते. केवळ एकाच जिल्ह्यासाठी असा निर्णय का, असा सवाल करत योग्य स्पष्टीकरण न दिल्यास कडक आदेश देण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. या न्यायालयीन दणक्यानंतर प्रशासनाला अखेर नरमाईची भूमिका घेत वेळापत्रकात बदल करावा लागला आहे.
