बारामती | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर आता पवार कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेले एक भावनिक पत्र सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या पत्रातून बारामतीतील विविध प्रश्नांकडे पवार कुटुंबीयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आर्त विनंती करण्यात आली आहे.
या कथित पत्रामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती ‘पोरकी’ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दादांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या विकासाला मिळालेली दिशा, प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि सामान्य नागरिकांशी असलेला संपर्क यांची आठवणही पत्रातून करून देण्यात आली आहे.
बारामतीतील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, नगरपरिषदेचा कारभार तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकीय प्रश्नांचा उल्लेख या पत्रात करण्यात आल्याचे समोर येत आहे. दादांच्या अनुपस्थितीत या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि पवार कुटुंबीयांनी बारामतीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
पत्रात शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांना उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, हे पत्र नेमके कोणी लिहिले, त्यामागील व्यक्ती कोण आहे आणि पत्रातील सर्व दावे अधिकृतपणे पुष्टी झाले आहेत का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पत्रातील आरोप अथवा दावे हे संबंधित पत्रातील म्हणणे म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची उणीव बारामतीला जाणवत असल्याची भावना या पत्रातून व्यक्त होत असून, सोशल मीडियावर या पत्राची चर्चा सुरू आहे.














