सहसंपादक- अक्षय थोरात
खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी खंडेश्वरी माता मंदिर परिसरात ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावातील सर्व मान्यवर, तरुण मंडळे, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, यावर्षीची यात्रा पारंपरिक उत्साहाऐवजी साध्या आणि मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात येईल. सालाबादप्रमाणे आयोजित होणारे तमाशा, कुस्त्यांचे फड, दारूगोळा (फटाक्यांची आतषबाजी), तसेच आकर्षक विद्युत रोषणाई यांसारखे करमणुकीचे सर्व कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले आहेत.
स्व. अजितदादा पवार यांच्या अलीकडील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शोकभावनेतून हा निर्णय घेतल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गावाच्या एकजुटीचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवत अनावश्यक खर्च टाळून धार्मिक विधींवर भर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
तथापि, देवीचे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. रामनवमी, पालखी सोहळा, लळीत, नैवेद्य नारळ अर्पण तसेच हनुमान जन्मोत्सव हे सर्व धार्मिक विधी साध्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात आयोजित केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
यात्रा समितीने स्पष्ट केले की, गावातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक परंपरा अबाधित ठेवत साधेपणातून श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय जाहीरपणे कळविण्यात येत असून सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
















