संपादक- मधुकर बनसोडे
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाना प्रशासन या दोघांपुढेही एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. यंदाच्या हंगामात पाऊस, तापमान, आर्द्रता आणि प्रकाशमानातील बदलांमुळे तुरा येण्याचे प्रमाण अपेक्षितपेक्षा खूप वाढले आहे. तुरा आल्याने उसाच्या कांड्यांची वाढ थांबते, पाने पिवळसर पडतात आणि त्याचा थेट परिणाम साखर उताऱ्यावर होतो. हा तुरा आलेला ऊस दीड-दोन महिने शेतात उभा राहिल्यास तो पोकळ पडतो, त्याला पांगशा फुटतात आणि साखरेचे विघटन होऊन उताऱ्यात मोठी घट होते. तंतूमय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने रसकाढ्यातही १८ ते २० टक्क्यांपर्यंत कमी येण्याची शक्यता आहे, ही शेतकऱ्यांसाठी गंभीर बाब आहे.
या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवणे, नत्राचे संतुलित व्यवस्थापन करणे आणि निंबोळी पेंडीचा वापर करणे यांसारखे उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोमेश्वर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन जारी केले आहे, ज्यामुळे कारखाना प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, केवळ मार्गदर्शनावर हे संकट टळणार नाही. तुरा आलेल्या उसाचे गाळप लवकरात लवकर करणे हा साखर उताऱ्यावरील नकारात्मक परिणाम कमी करण्याचा एकमेव उपाय आहे.
कारखाना प्रशासनावर आता मोठी जबाबदारी आहे. त्यांनी तातडीने विशेष तोडणी मोहीम आखून तुरा आलेल्या ऊस उत्पादक सभासदांच्या उसाला तोडणीसाठी अग्रक्रम देणे अत्यंत आवश्यक आहे. खोडवा उसाला तुरा येण्याचे प्रमाण अधिक असल्याने, त्यांच्या तोडणीचे नियोजन तातडीने करावे लागेल. अन्यथा, उसाचे वजन आणि साखर उतारा दोन्ही घटून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होईल आणि कारखान्याचा सरासरी साखर उताराही घसरेल. कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन तुरा आलेल्या उसाचे गाळप जलद गतीने करण्यासाठी तोडणी यंत्रणांचे सुनियोजन करणे, तसेच शेतकरी सभासदांना दिलासा देण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
या परिस्थितीत कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
















