भोसरी , 19 जून 2026:- ‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या पवित्र संकल्पाला प्रत्यक्षात साकार करत संत निरंकारी मिशन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एक व्यापक योग व आध्यात्मिक चेतना अभियान आयोजित करत आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वाद आणि दूरदर्शी मार्गदर्शनाखाली राबवले जाणारे हे प्रेरणादायी अभियान मानवकल्याण, समग्र आरोग्य आणि आत्मिक उन्नतीच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे.
सतगुरु माता जींचा प्रेरक संदेश – “स्वस्थ मन, सहज जीवन” या सत्याला अधोरेखित करतो की जीवनाची खरी समृद्धी केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक जागरूकतेत आहे. सतगुरु माता जींनी आपल्या प्रवचनामध्ये अनेकदा उल्लेख केला आहे कि मानवी शरीर ही परमात्म्याची अनुपम देणगी आहे, ज्याची देखभाल आणि सुदृढता व्यक्तीला आपल्या आध्यात्मिक, सामाजिक आणि मानवी जबाबदाऱ्या अधिक उत्तम प्रकारे पार पाडण्यास सक्षम बनवते. हे अभियान योगाला केवळ शारीरिक व्यायाम न मानता आत्मबोध, अंतर्गत शांतता, मानवीय एकता आणि विश्वबंधुत्वाची भावना विकसित करणारी एक समग्र जीवनसाधना म्हणून स्वीकारण्याचा संदेश देते.
याच प्रेरणादायी भावनेनुसार जागतिक योग्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनतर्फे रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी 6:00 वाजता पुणे जिल्ह्यातील मिशनच्या सत्संग भवन भोसरी ,पिंपरी ,रुपीनगर सह भारतभरातील 1500 हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी योग शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मिशनच्या विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोकळ्या मैदानांमध्ये आणि उद्यानांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये श्रद्धाळू, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी होतील.
या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “स्वस्थ जीवनासाठी योग”. हा संदेश आपल्याला स्मरण करून देतो की खरे आरोग्य केवळ रोगमुक्त शरीरापुरते मर्यादित नसून मानसिक स्थैर्य, भावनिक परिपक्वता, सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक जागरूकता यांचा समन्वय आहे. या दृष्टिकोनातून संत निरंकारी मिशन योगाला जीवनात संतुलन, सकारात्मकता आणि आत्मजागरूकतेचे प्रभावी साधन मानून समाजात जागरूकता प्रस्थापित करत आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा जी यांनी सांगितले की 2015 पासून फाउंडेशनतर्फे ‘योग दिवस’ हा राष्ट्रव्यापी अभियान नियमितपणे राबवला जात आहे. योग ही भारताची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा आहे, जी केवळ शरीर मजबूत करत नाही तर मनाला स्थिरता, विचारांना सकारात्मकता आणि आत्म्याला चेतना प्रदान करते. नियमित योगाभ्यासामुळे तणाव आणि जीवनशैलीशी संबंधित समस्यांवर नियंत्रण मिळवता येते आणि व्यक्ती आत्मिक समाधान, मानसिक आनंद आणि सामाजिक सद्भावाच्या दिशेने अग्रेसर होतो.
आजच्या धावपळीच्या आणि आव्हानात्मक जीवनशैलीत संत निरंकारी मिशनच्या जनकल्याणकारी अभियानाचा हाच उद्देश आहे की समाजात सर्वांगीण कल्याणाबाबत जागरूकता निर्माण करणे, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून निरोगी, संतुलित, ऊर्जावान आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करू शकेल.














