सोमेश्वरनगर- येथील मु .सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक १५ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयली घिया यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीशराव लकडे, मुगुट महोत्सवाचे प्रमुख प्रा. हिराचंद काळभोर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. तर प्रा. हिराचंद काळभोर यांनी सात दिवसाच्या मुगुट महोत्सवामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत भैय्या यांनी मुगुट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आयली घिया यांनी जीवनात आनंद आवश्यक आहे, आणि हा आनंद कलेच्या माध्यमातूनच आपल्याला मिळत असतो. म्हणूनच कलेकडे आनंद म्हणून पाहिले पाहिजे . तसेच महाविद्यालय परिसर आणि महाविद्यालयातील वातावरण खूप आवडल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी मराठी, हिंदी गाण्यांवरती नृत्य केले व उपस्थित विद्यार्थ्यांना नृत्याचे बारकावे शिकवले.
मुगुट महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक व माझी विद्यार्थी आर. एन. (बापू) शिंदे, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख,प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.महेंद्रसिंह राजे जाधवराव, प्रा. विलास बोबडे, श्री संकेत जगताप, मुगुट महोत्सव प्रमुख प्रा. हिराचंद काळभोर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी ‘महाविद्यालयाच्या स्मरणातील दिवस म्हणजे स्नेहसंमेलन, आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने तो द्विगुणित होतो. महाविद्यालयाने जी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे त्या संधीच्या माध्यमातून. आपल्या कलागुणांचा अविष्कार करण्याची संधी याच्या तून उपलब्ध होते आणि या कला गुणा तून व्यक्तिमत्व साकार होते. तसेच जीवनाला सुंदर बनवण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात कला, क्रीडा अशा अनेक गोष्टींचा समावेश केला आहे.आणि या महोत्सवातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण आहेत हे ओळखून पुढील जीवनाची वाटचाल केली पाहिजे. जीवनामध्ये कार्य करताना सुरुवातीला यश मिळेलच असे नाही, परंतु सातत्याने प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते. स्वतःच्या चुकांमधून जो शकतो तोच जीवनात यशस्वी होतो, असे विचार त्यांनी मांडले. आयुष्याला जर दिशा मिळाली नाही तर आयुष्याची दशा होती आणि ही दिशा या महोत्सवामुळे तुम्हाला मिळाली आहे. जीवनात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर ध्येय निश्चित करा आणि एकदा ध्येय निश्चित केले की ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा तरच यश मिळेल. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. व महाविद्यालयाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. मुगुट महोत्सवाचे प्रमुख प्रा. हिराचंद काळभोर यांनी प्रास्ताविक मध्ये महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनच या मुगुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तसेच शिस्तीचे पालन करून सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख यांनी मुगुट महोत्सवाला शुभेच्छा दिल्या व शेवटी बक्षीस पात्र शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
या महोत्सवामध्ये ‘काव्य मैफल’ याचे आयोजन करण्यात आले होते कवी भरत दौंडकर, कवी हनुमंत चांदगुडे उपस्थित होते, त्यांनी शेतकरी, आई, वडील राजकीय या विषयावर कवितांचे सादरीकरण केले. तसेच प्रेम कविता बरोबरच शेणामातीतल्या कवितांना ही विद्यार्थ्यांनी दाद दिली. ग्रामीण भागातील युवकांचे, शेतीचे जागतिकीकरणाने आलेल्या अस्वस्थतेचे प्रश्न कवीने कवितेच्या माध्यमातून मांडले. यावेळी कवी सोमनाथ सुतार, कवी दत्तात्रेय जगताप उपस्थित होते. तसेच ‘चांडाळ चौकटीच्या करामती’ या वेब सिरीज चे कलावंत मा. रामभाऊ जगताप, मा. भरत शिंदे, मा. सुभाष मदने यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी या कालावंतांची प्रकट मुलाखत घेऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी यांनी आपल्या मुलाखतीतून त्यांच्या यशाची गमक सांगितले तसेच जे यश मिळाले आहे ते यश सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी खूप कष्ट, मेहनत, चिकाटी जिद्द या जोरावर मिळालेलं आहे. खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचलो आहे असे आवर्जून या कलावंतांनी सांगितले यावेळी त्यांनी आपली कला सादर करून सर्वांचीचं वाह!वाह मिळवली.
तसेच या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, स्पोर्ट्स डे, मिस मॅच डे, वक्तृत्व स्पर्धा, नाविन्यपूर्ण म्हणी तयार करणे, प्रश्नमंजुषा, एक मिनिट मराठी बोला स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, तसेच आनंद मेळा, शेला पागोटे आणि फूड अँड फन फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल तसेच शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तर महिला शिक्षकांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन याचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘फॅन्सी ड्रेस’ चे आयोजन केले होते यामध्ये हिरकणी, पुष्पा, संविधान ची शपथ, ते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक, तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वांची वाह, वाह! मिळवली. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. निलेश आढाव यांनी केले होते.
मुगुट महोत्सवाचा शेवट हा विविध गुणदर्शनाने झाला. यामध्ये गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये चंद्रा, अप्सरा या लावण्यांना प्रतिसाद मिळाला तसेच कारगिल युद्धाचा प्रसंग व शहीद जवानांना आदरांजली, हिंदी, मराठी नव्या , जुन्या गाण्यांनी कार्यक्रमाला रंगत आली . तसेच कृष्णलीला, माऊली, कोळी नृत्य व शेवटी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याने या कार्यक्रमामध्ये रंगत आली. याचे नियोजन समन्वयक प्रा. अच्युत शिंदे यांनी केले होते.
संपूर्ण मुगुट महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . अच्युत शिंदे यांनी केले. या संपूर्ण मुगुट महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे , व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्य या सर्वांचेच विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मुगुट महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुगुट महोत्सव प्रमुख प्रा. हिराचंद काळभोर व विविध समितींचे समन्वयक सदस्य , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच सहकार्य लाभल्याने हा सात दिवसाचा ‘मुगुट महोत्सव २०२५’ यशस्वीरित्या संपन्न झाला .
