संपादक. मधुकर बनसोडे.
पुरंदर तालुक्यातील निरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सध्या अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उघड्या व तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. एसटी स्टँड च्या समोर गटारे साफ न झाल्यामुळे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या गटारांच्या शेजारीच अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत. किरकोळ दुकाने, हातगाडीधारक तसेच लहान-मोठे व्यावसायिक यांना या अस्वच्छतेचा थेट फटका बसत आहे. ग्राहकांना दुर्गंधीमुळे थांबणेही कठीण होत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळ विक्रीचे स्टॉल तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही उभारलेले आहेत. उघड्या गटारांमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छ वातावरणामुळे येथे विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गटारांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच निरा शहरांमध्ये जीबीएस चा रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुंबलेल्या गटरांमुळे अनेक आजारांना भविष्यात निरेकरांना सामोरे जावे लागेल त्यामुळे आरोग्य प्रशासनाने देखील वेळीच ग्रामपंचायत प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्यात अशी देखील भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अनेक व्यावसायिकांकडून वारंवार गटार स्वच्छ करण्याच्या सूचना देऊन सुद्धा गटर जैसे थेच आहे
त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर वाढताना दिसत आहे.
निरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वच्छतेचा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी “विकास गटारात तुंबला” अशीच भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पुरंदर तालुक्यामध्ये नीरा मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते हजारो नागरिक दररोज निरे मधून ये जा करत असतात या नागरिकांच्या जीविताअशी खेळण्याचा ग्रामपंचायत प्रशासनास कोणताही अधिकार नाही.
ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित गटार स्वच्छ करण्याची व्यवस्था करावी हीच निरेकरांची मापक अपेक्षा असल्याच्या भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहेत.










