उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली गावात विविध कामांचे भूमिपूजन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्प शेतीसाठी उपयुक्त ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या तरडोली पाझर तलाव जोड प्रकल्पामुळे तरडोली परिसरातील शेतीला पाणी मिळून ते शेतीसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईटेवाडी येथे सुरु केलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना अंतर्गत तरडोली पाईप लाईन जोडप्रकल्पाचे उद्धघाटन करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, सा. बां. पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता सा.बां. (वैद्यकीय) रामसेवक मुखेकर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सिद्धार्थ इंगळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर,

सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरषोत्तम जगताप, जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे सदस्य हनुमंत भापकर, सरपंच विद्या भापकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार म्हणाले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून केलेल्या १ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमुळे तरडोली परिसरातील शेतीच्या पाण्याची मागणी कमी होणार आहे.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या कालावधीत या तलावातील पाणी उपयोगी पडेल. जिल्हा परिषद आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११४ गाळमुक्त लघु पाटबंधारे प्रकल्प योजना सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असून शेतीला पुरेसे पाणी मिळेल, असे श्री.पवार म्हणाले. त्यांनी या कामाबद्दल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनिबद्दल गौरवोद्गार काढले.

शेतकऱ्यांनी केवळ ऊस पीक न घेता कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. या पिकातूनही चांगले उत्पादन मिळते. राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ सर्वांना मिळावयास हवा. सार्वजनिक विकासकामे करताना कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ असावीत. कामे वेळेत पूर्ण होईल याकडेही लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तरडोली येथील २५ लाख रुपयांच्या समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.