मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

निंबुत गावाने इतिहास घडवला! देशात पहिल्यांदाच श्रीराम मंदिर आणि मदिना मस्जिदचे एकत्र उद्घाटन: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श प्रतीक

mnewsmarathi प्रतिनिधी
October 30, 2025 1 मिनिटांचे वाचन 5003 वेळा पाहिले

प्रतिनिधी.

बारामती तालुक्यातील निंबुत हे छोटेसे पण प्रगतिशील गाव आता देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. कारणच तसे विलक्षण आहे — देशाच्या इतिहासात प्रथमत:च एका गावात श्रीराम मंदिर आणि मदिना मस्जिद या दोन्ही पवित्र स्थळांचे एकाच दिवशी, एकत्र उद्घाटन व लोकार्पण होत आहे!

हा अनोखा आणि प्रेरणादायी सोहळा उद्या (दिनांक ३१ ऑक्टोबर) श्री. भैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट आणि सतीशभैय्या कल्याणकारी संघ, निंबूत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार आणि खासदार मा. सुनेत्राताई पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.

आजच्या सामाजिक परिस्थितीत जिथे धर्म आणि जात यावरून भेदभाव, वादविवाद वाढताना दिसत आहेत, तिथे निंबुत गावाने ‘एकतेचा संदेश देणारा इतिहास’ रचला आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये परस्पर सलोखा, सन्मान आणि बंधुता यांचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.

या विलक्षण उपक्रमामागे श्री. सतीशभैय्या काकडे देशमुख यांची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि अद्वितीय कल्पना आहे. त्यांनी गावातील सर्व समाजघटकांना एकत्र आणत “सर्व धर्मांचा सन्मान — हीच खरी भारताची ओळख” हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविला आहे. त्यांची ही संकल्पना केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्याचा दीप बनली आहे.

गावात जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी सतीशभैय्या काकडे देशमुख हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. समाजात कोणतीही फूट न पडता सर्व धर्म, जाती आणि पंथ यांना समान सन्मान मिळावा, ही त्यांची कार्यतत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या या दूरदृष्टीतून आणि अखंड प्रयत्नांतूनच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरवीर उमाजी नाईक, शाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे या थोर समाज सुधारक आणि क्रांतिकारक महापुरुषांचे पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. ही स्मारके समता, बंधुता आणि एकतेचे जिवंत प्रतीक म्हणून उभी आहेत. या सर्व उपक्रमांमधून सतीशभैय्या काकडे देशमुख यांनी निंबुत गावाला सामाजिक सौहार्द आणि मानवतेच्या मूल्यांचा आदर्श केंद्र बनवले आहे. निंबुत गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे हिंदू-मुस्लिम दोन्ही समाज सण-उत्सव एकत्र साजरे करतात, दु:ख-सुखात सहभागी होतात. ही एकता आणि आपुलकी आता देशभरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या कार्यक्रमात विविध समाजातील मान्यवर, धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सर्व धर्मीय बांधवांनी “एकतेचा उत्सव” म्हणून या सोहळ्याची तयारी केली आहे.

निंबुत गावाने आज दाखवलेली ही दिशा एकतेची, समरसतेची आणि मानवी मूल्यांची आहे आणि हीच खरी “विकसित भारताची ओळख” ठरेल, असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा