प्रतिनिधी
बारामती तालुक्यात अलीकडच्या
काळात काही वाहनधारकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः गाड्यांवर आमदार किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे लोगो लावणे, काचांवर ब्लॅक फिल्मिंग करणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवणे या प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कडक कारवाई होणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नियमांनुसार कोणत्याही खासगी वाहनावर अधिकृत परवानगीशिवाय आमदार किंवा शासकीय पदांचा लोगो लावणे बेकायदेशीर आहे. तसेच वाहनांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावण्यावरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही काही वाहनधारकांकडून या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे कायद्याचा धाक कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
याशिवाय, काही गाड्या भरधाव वेगाने रस्त्यावरून धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः शहरातील मुख्य रस्ते, शाळा परिसर आणि बाजारपेठांमध्ये अशा वाहनांचा वेग नियंत्रणात नसल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांना वेगळा न्याय तर धनदांगड्यांसाठी वेगळा न्याय आहे का? अशा चर्चास्थानिकांमधून समोर येत आहेत
स्थानिक पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन , नियमभंग करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. अशा वाहनांची तपासणी करून, ब्लॅक फिल्मिंग काढून टाकणे, अनधिकृत लोगो हटवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता येत्या काळात बारामती तालुक्यात या नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कितपत प्रभावी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे









