सोमेश्वरनगर (ता. बारामती), दि. ३ : बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निंबुत येथे शुक्रवार (दि. ३ जुलै) रोजी स्वागत समारंभ तसेच कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात संवाद साधत ग्रामीण विकास आणि आधुनिक कृषी विषयक विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वतःचा परिचय करून देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आगामी काही दिवस गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणे, कृषीविषयक जनजागृती, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती, विविध कृषी उपक्रमांचे आयोजन तसेच ग्रामविकासाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थिनींनी ग्रामस्थांना या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बारामती कृषी महाविद्यालयाचे खेती बचाव अभियान मार्गदर्शक गोडसे सर, आकाश गोडसे (एआय मार्गदर्शक) तसेच कृषी सहाय्यक अधिकारी गडाख मॅडम यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस, केळी, पालेभाज्या शेतीमध्ये होणारा उपयोग, आधुनिक शेतीतील बदल आणि भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तन्वी मोरे, अनन्या हापसे, जानवी डोळस, सुवर्णा लोखंडे, राजकुवर राजे भोसले, गायत्री जाधव आणि दिशा फडतरे यांनी विशेष प्रयत्न केले.
या कार्यक्रमास उपसरपंच अमरसिंह काकडे, विजयराव काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, संभाजी काकडे, विलास काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, कुसुम काकडे, प्रमोद बनसोडे, अजय काकडे, प्रवीण काकडे, लघुउद्योजक स्वाती काकडे, विविध बचत गटांच्या महिला, आशा वर्कर, गावातील शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेतीची प्रत्यक्ष माहिती मिळण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांनाही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












