प्रतिनिधी
लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत अटक केली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक व्यावसायिक आपल्या कारने जात असताना, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील सुमारे ११ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन बळदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. आणि शस्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळवली. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने ६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांचे पथक मध्यप्रदेश राज्यात रवाना झाले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:
१. अविनाश किशनचंद्र त्रिपाठी (वय ४३, रा. उत्तर प्रदेश)
२. मोहम्मद शोएब वसीम (खान) सिध्दीकी (वय ३७, रा. उत्तर प्रदेश)
३. सुरेंद्र रामचंद्र पाल (वय ३२, रा. उत्तर प्रदेश)
पोलिसांनी तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेतला आणि त्यांना पुढील तपासासाठी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि उत्तर प्रदेश येथे खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि दरोड्यासारखे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन २०१८ मध्ये उत्तर प्रदेश एसटीएफने चकमकीनंतर याला अटक केली होती, तसेच नेपाळ सरकारनेही त्याला पकडण्यासाठी विशेष बक्षिस जाहीर केले होते. इतर आरोपींवरही उत्तर प्रदेशमध्ये चोरी व दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखा युनिट-७ च्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.



















