• Home
  • माझा जिल्हा
  • सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची ससून डॉक येथे सांगता मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image

सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची ससून डॉक येथे सांगता मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी

*एनडीआरएफचे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करणार*

 

*■ केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला*

*मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार: ना सुधीर मुनगंटीवार*

मुंबई :- महाराष्ट्रातील मच्छिबांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान झाल्यास त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मदतीबाबतचे निकष बदलण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले.

मच्छिमारांसाठी मत्स्यव्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभासंबंधी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागर परिक्रमेचा सांगता समारंभ (तृतीय चरण) कार्यक्रम मुंबई शहर जिल्हयातील नवीन भाऊचा धक्का येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री. परषोत्तम रूपाला, श्रीमती सविता रुपाला, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर,मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश बालदी, केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव श्री. जे एन स्वेन, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे यांच्यासह ससून डॉक येथील स्थानिक मच्छिमार मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला असून येणाऱ्या काळात पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचे काम राज्य शासन प्राधान्याने करणार आहे.याशिवाय मुंबईतील कोळीवाडयाचे सुशोभीकरण, कोळीवाडयांचा पुर्नविकास यालाही प्राधान्य देण्यात येईल. दर्याचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोळीबांधवांचा विकास, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यासह त्यांची सुरक्षा याला सुध्दा आगामी काळात प्राधान्य देण्यात येईल. डिझेल परतावा, कोल्ड स्टोरेजची सुविधा यासारखे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.

*चौकट*

काही दिवसांपूर्वी 10 लोकांच्या मच्छिजाळीचे नुकसान झाले होते. 10 मच्छिमारांची जाळी जळाल्याने त्यांना मत्स्यव्यवसाय करण्यास अडचण येत होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी त्या 10 मच्छिमारांना जाळीसाठी 54 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील असे या कार्यक्रमात जाहीर केले.

केंद्रीय मंत्री श्री. रुपाला म्हणाले की, मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. मत्स्य संपदा योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध देण्यात येत आहे. या योजनेचा आणि इतर योजनांचा फायदा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मच्छिमारांनी घ्यावा.

मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पुढच्या पिढीलासुद्धा मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.रूपाला यांनी केले.सागर परिक्रमेदरम्यान महाराष्ट्रातील मच्छिमारांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवल्याचेही श्री. रुपाला यांनी यावेळी सांगितले.

*मत्स्यव्यवसाय उद्योगाला चालना देणारे पुरक जोडधंदे आणि रोजगार उपलब्ध होणे आवश्यक*

*— ॲङ राहुल नार्वेकर*

विधानसभा अध्यक्ष ॲङ नार्वेकर यावेळी म्हणाले की, मच्छिमार हे आपला जीव मुठीत घेऊन मच्छिमारी करुन आपली उपजिविका करतात. मात्र हे करीत असताना त्यांची सुरक्षेची काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे. मुंबईतील सर्वात महत्वाचा असा ससून बंदर हे मोठे आणि महत्वाचे बंदर असून याचा विकास याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मच्छि ही नाशवंत प्रकारात येत असलयाने कमी वेळेत हे विकले जाणे आवश्यक आहे. मच्छि त्वरीत विकण्यासाठीची एक साखळी प्रक्रिया तयार करणे, मत्स्यव्यवसाय उद्योगाला चालना देणारे पुरक जोडधंदे आणि रोजगार उपलब्ध होणे यावर भर देणे आवश्यक आहे.

*मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार*

*ससून डॉक ची जागा केंद्राने महाराष्ट्राला द्यावी*

*- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार*

मुंबई : मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यामध्ये याविषयी कायदा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासन मच्छीमारांच्या हितासाठी कायदाही करेल, असे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री परशोत्तम रूपाला यांच्या सागर परिक्रमा यात्रेच्या तिसऱ्या चरणाची सांगता ससून डॉक येथे झाली यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री मुनगंटीवार म्हणाले की, केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांनी काढलेली सागर परिक्रमा स्वातंत्र्यानंतर अनुत्तरित राहिलेल्या मच्छीमार बांधवांचे प्रश्न गतीने सोडविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रात ना श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार कोणत्याही कामाला “नो” म्हणणारे नसून विकासाच्या कामाला वेगाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात सागरी पिंजरा धोरण करण्याचाही मनोदय असल्याचे यावेळी श्री मुनगंटीवार म्हणाले. समुद्रात येणाऱ्या नवीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळावी असा नियम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे तेथे कायदे करु तसेच येत्या काळात मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच आणण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असल्याने शासन या व्यावसायिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठीशी असून यासाठीच हे धोरण ठरविण्यात येत आहे.

Releated Posts

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असतानाच लग्नसराईचा हंगाम मात्र जोरात सुरू आहे…

प्रतिनिधी (लेखन- सोपान कुचेकर) गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे… पहाटेपासून सुरू होणारी…

ByBymnewsmarathi May 13, 2026