प्रतिनिधी –
रागिणी फाऊंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिक संघ, बारामती येथे जागतिक महिला दिन निमित्त भव्य कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. हे कविसंमेलन “ती च्या कविता” या विषयावर आधारित असल्यामुळे महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.
या कविसंमेलनात सादर झालेल्या कविता अत्यंत भावनिक, संवेदनशील व प्रभावी होत्या. सभागृह पूर्ण भरलेले असल्याने प्रत्येक कवीच्या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळत होता आणि वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. या कविसंमेलनाचे अध्यक्षपद प्राचार्य सिताराम गोसावी यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. सिमा नाईक-गोसावी (मराठी विभागप्रमुख व कला शाखा अधिष्ठाता, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती) व वनकवी लक्ष्मण शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या कविसंमेलनात विविध ठिकाणांहून आलेल्या सुमारे ५० हून अधिक कवींनी सहभाग नोंदविला. दुपारच्या सत्रात परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक बौद्धिक व समृद्ध स्वरूप प्राप्त झाले.
रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशी प्रकाशनचे बाळासाहेब कर्चे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कविसंमेलन योग्य वळणावर ठेवण्यासाठी सुत्रसंचालनाची जबाबदारी अलका रसाळ यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली.










