दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय वातावरणात आगमन झाले. यावेळी श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.सतीशभैय्या काकडे दे., उपाध्यक्षा सौ. सुप्रियाताई अश्विनकुमार पाटील, ज्येष्ठ संचालक मा.श्री.भीमराव बनसोडे सर, मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या होत्या, ज्यांच्या पायघड्यांवरून माऊलींची पालखी मार्गस्थ झाली.
या स्वागताचे मुख्य आकर्षण विद्यालयातील विद्यार्थिनींचे ‘शकुंतलामाई लेझीम पथक’ ठरले. विद्यार्थिनींनी लेझीमच्या कडकडाटात पालखीला मानवंदना दिली. विशेष म्हणजे, या पथकातील विद्यार्थिनींच्या हातात ‘भारतीय संविधानाचे महत्त्व’ सांगणारे प्रबोधनात्मक फलक होते. धार्मिक निष्ठेला लोकशाही आणि राष्ट्रभक्तीच्या मूल्यांची जोड देणारा विद्यालयाचा हा अनोखा उपक्रम सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांच्या कौतुकाचा विषय ठरला.
यावेळी टाळ मृदंगाच्या तालावर, हातात भगवी पताका घेऊन,ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात अवघे निंबुत गाव भक्तिमय झाले होते. यानंतर निंबुत गावात पालखी सोहळा मुक्कामी विसावला .












