प्रतिनिधी
(लेखन- सोपान कुचेकर)
गावोगावी मंगल कार्यालये, बँड-बाजा, वाजंत्री आणि पाहुण्यांची लगबग पाहायला मिळत आहे…
पहाटेपासून सुरू होणारी ही लग्नाची धांदल रात्री उशिरापर्यंत सुरूच असते… नवरदेव आणि नवरी सजलेल्या गाडीत बसलेले असतात… तर दुसरीकडे अक्षरशः कडक उन्हात वाजंत्री पायी चालताना दिसतात…
सकाळचे नऊ-साडेनऊ वाजले तरी उन्हाचा तडाखा एवढा प्रखर असतो की रस्त्यावर चालणंही कठीण होतं… मात्र तरीही ढोल-ताशा, सनई-चौघडा आणि गाण्यांच्या तालावर वरात उत्साहात पुढे सरकत असते…
“गणाला माझ्या घेऊन ये…” अशा गाण्यांवर काही कलाकार मनमोकळेपणाने गाताना दिसतात… पण या आनंदामागे अनेक कामगारांचे कष्ट लपलेले आहेत… फोटोग्राफर सकाळपासून नवरी-नवरदेवांच्या मागे पुढे करत प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असतो…
कडक उन्हात घामाने अंग चिंब झालं तरी त्याची धावपळ थांबत नाही… तर वाजंत्री वाजवणारे कलाकारही उन्हाची पर्वा न करता आपल्या कलेत मग्न होऊन वातावरण रंगवत असतात…
घामाच्या धारा वाहत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र कायम दिसून येतो… मात्र अनेक वेळा या मेहनती कलाकारांना साधं पाणी विचारायलाही काही जण विसरतात…
उन्हाळ्याच्या या प्रखर तापमानात त्यांनाही थोडी माणुसकी आणि आधाराची गरज असते… लग्न समारंभ आनंदाचा असला तरी या आनंदामागे अनेक हात राबत असतात…
त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे… उन्हाळ्याच्या या लग्नसराईत आनंदासोबत माणुसकीचंही दर्शन घडणं गरजेचं आहे…













