प्रतिनिधी
हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ६ मे) पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे चारठाणा परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत महिलेचे नाव सुमित्रा श्रीधर गायकवाड (वय ३८, रा. चारठाणा, ता. जिंतूर) असे आहे. तर आरोपी पतीचे नाव श्रीधर गायकवाड असे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपी श्रीधर गायकवाड याने पत्नी सुमित्रा हिला दुचाकीवर बसवून गावालगत असलेल्या जिंतूर–जालना महामार्गावरील शेत आखाड्याजवळील निवाऱ्यावर नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने पत्नीला काठीने मारहाण केली. त्यानंतर संतापाच्या भरात तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिचा खून केला. या हल्ल्यात सुमित्रा गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी थेट चारठाणा पोलीस ठाणे येथे हजर झाला. “मी माझ्या पत्नीचा खून केला आहे,” अशी कबुली देत त्याने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार उध्दव माने, उध्दव सातपुते तसेच गुप्तचर विभागाचे उमेश बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे पाठविला आहे.
प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय हे हत्येमागील कारण असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास चारठाणा पोलीस करत आहेत.












