प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे आज होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP च्या आंदोलनावरून देशभरात मोठी चर्चा रंगली आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, NEET पेपर लीक, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मात्र आंदोलनाच्या आधीच “परवानगी मिळाली का नाही?” हा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे.
दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला स्पष्ट केले होते की, CJP कडून आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही. जंतरमंतरसारख्या संवेदनशील आंदोलनस्थळी निदर्शनांसाठी नियमांनुसार पूर्वपरवानगी आवश्यक असते. अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी “अर्ज आल्यास विचार करू” अशी भूमिका घेतली होती.
दरम्यान, CJP संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर आंदोलन शांततापूर्ण राहील असा दावा केला. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना तिरंगा, पुस्तके आणि फुले घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले. “हिंसा करू नका, पोलिसांशी संघर्ष टाळा” अशा सूचना देखील देण्यात आल्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विविध वृत्तांनुसार एक हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी, RAF जवान, तसेच गुप्तचर यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. विमानतळ, सीमाभाग, रेल्वे स्थानके आणि जंतरमंतर परिसरात विशेष सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मात्र आज सकाळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके दिल्लीत पोहोचल्यानंतर पोलिसांकडून आंदोलनास अटींसह परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर CJP कडून समर्थकांना थेट जंतरमंतर येथे पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.
या आंदोलनामुळे तरुणांमधील शिक्षण व्यवस्थेबाबतचा असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर CJP ला मोठा पाठिंबा मिळताना दिसत असला, तरी परवानगी, कायदा-सुव्यवस्था आणि आंदोलनाच्या राजकीय परिणामांवरूनही तीव्र चर्चा सुरू आहे. पुढील काही तासांत दिल्लीतील परिस्थिती आणि प्रशासनाची भूमिका याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.













