प्रतिनिधी
पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी घडलेल्या खून प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी आपल्या वडिलांची हत्या झाल्याचा राग मनात बाळगून एका २४ वर्षीय तरुणाने मुख्य आरोपीचा निर्घृण खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मंथन वैद्य (वय २४) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये दिनेश वैद्य यांची जुन्या वैमनस्यातून हत्या झाली होती. त्या वेळी त्यांचा मुलगा मंथन अवघा दीड वर्षांचा होता. या हत्येतील मुख्य आरोपी संजय बाबूराव कडू-देशमुख याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला संजय यावर्षी एप्रिलमध्ये जामिनावर बाहेर आला. ही माहिती मिळताच मंथनने सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने सौरभ परदेशी, मिजान शेख आणि संदीप कोरी या तिघांसह संजयच्या हालचालींवर सुमारे तीन महिने पाळत ठेवली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिवनगर न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
अखेर जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख याला अडवून धारदार शस्त्रांनी तब्बल २८ वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या संजयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेचा तपास राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तपासाच्या आधारे वेगाने केला. त्यानंतर मंथन वैद्यसह चारही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे जुन्या वैमनस्यातून उफाळून आलेल्या सूडाच्या भावनेचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले असून, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.














