• Home
  • माझा जिल्हा
  • महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Image

महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रतिनिधी

जिल्ह्यात १८ ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची नोंदणी १२ ते १५ लाखाने कमी असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक साक्षरता मंचाच्या (ईएलसी) महाविद्यालय समन्वयक अधिकाऱ्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख पुढे म्हणाले, युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गतवर्षी ३८ महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना करुन चांगले काम करण्यात आले. यावर्षीही विशेष संक्षीप्त पुनरीक्षण मोहीम राबवताना विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांचा चांगला सहभाग अपेक्षित आहे. युवकांची मतदार नोंदणीतील उदासीनता दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुढील वर्ष हे निवडणूक वर्ष असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कालावधीत होणार आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता निवडणूक प्रक्रियेत अमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी केवळ छापील मतदार यादी मिळायची तर आता तंत्रज्ञानातील बदलामुळे आपल्या मोबाईलवर मतदार यादी उपलब्ध आहे.

पायाभूत सुविधांमध्ये बदल होत असताना आता निष्पक्ष, मुक्त वातावरणात निवडणुका आयोजित करण्यासोबतच त्या अधिक सर्वसमावेशक आणि मतदार सहभागपूर्ण होतील याकडे भारत निवडणूक आयोगाद्वारे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यातूनच तृतीयपंथी, देहविक्री व्यवसायातील महिला आदी दुर्लक्षित घटकांची मतदार नोंदणी करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

यावेळी श्रीमती कळसकर यांनी मतदार नोंदणी, वगळणी, नाव, तपशीलातील दुरुस्ती आदींबाबत तसेच नमुना ६, नमुना ७ तसेच नमुना ८ भरण्याविषयी सविस्तर माहिती दिली. निवडणूक साक्षरता मंचमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याचा त्यांना करिअर घडविताना फायदा होतो, असेही त्या म्हणाल्या.

उपजिल्हाधिकारी श्रीमती तांबे यांनी निवडणूक साक्षरता मंचाअंतर्गत पुढील काळात करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या अनुषंगाने लवकरच महाविद्यालयांसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे श्री. गुजराथी यांनी ईएलसी स्थापना, त्याबाबतचे सामंजस्य करार, विद्यार्थ्यांची इंटर्नशीप अंतर्गत निवड, मतदार जागृतीसाठी विविध स्पर्धा, उपक्रम तसेच निवडणूक साक्षरता मंडळांसाठीचे ॲप आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीस ५२ महाविद्यालये, निवडणूक साक्षरता मंचाचे प्रतिनिधी, समन्वय अधिकारी, ६ महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026