प्रतिनिधी.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर कॅम्प आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर , तालुका पुरंदर येथे आयोजित या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कॅम्पदरम्यान ट्रेझर हंट, सह्याद्री ट्रेक, कॅम्पफायर, गटचर्चा, टीम बिल्डिंग, नेतृत्व विकास तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस, शिस्त, संघभावना आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन ताणतणावापासून दूर जाऊन नवीन अनुभव घेण्याची संधी मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी कॅम्पबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे आयोजन वारंवार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या पदाधिकाऱ्यांनी कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्वयंसेवक, सहभागी विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
“साहस, शिक्षण आणि आठवणी — एकाच कॅम्पमध्ये!” या संकल्पनेला साजेसा अनुभव विद्यार्थ्यांना या कॅम्पमधून मिळाला.













