प्रतिनिधी
मेळघाटातील घुटी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडला. दादू भब्बा दारशिंबे (२७, रा. सावऱ्या), दादू याची पत्नी शारदा दारशिंबे (२४) आणि त्यांची दोन लहान मुले या अपघातात ठार झाली आहेत.
होळीच्या सणानिमित्त दारशिंबे कुटुंबातील चार जण दुचाकी वाहनाने धारणी शहरात होळी सणानिमित्त बाजार करण्यासाठी आले होते. बाजारातील साहित्य खरेदी करून हे कुंटुंब आपल्या मूळ गावी सावऱ्या येथे परतीच्या मार्गावर होते. घुटी गावाजवळ एमएच २९ / ऐ आर १४५६ या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दादु भब्बा दारशिबे, शारदा दारशिबे व त्यांची दोन मुले जागीच ठार झाले.
सावऱ्या येथील गावकऱ्यांची होळी काळी ठरली आहे. सध्या मेळघाटातील सर्वच गावांमध्ये होळी सणाची लगबग सुरू आहे. साहित्य खरेदीसाठी खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी धारणीच्या बाजारपेठेत येत असतात. दारशिंबे हे आपल्या दुचाकी वाहनाने धारणीत आले होते. बाजार करून परत गावाकडे जात असताना हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन बालके दुचाचाकी वाहनाच्या समोर पेट्रोल टाकीवर बसले होते. कारची धडक एवढी जबर होती की, चारही जण दुचाकीवरून दूर फेकले गेले आणि जागीच ठार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत.
















