प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, अनेक आमदार आणि खासदार बारामतीत दाखल होत आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न स्थानिक पातळीवर चर्चेत आला आहे — बारामतीत बाहेरच्या नेत्यांच्या प्रचाराची खरंच गरज आहे का?
या निवडणुकीत सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. पवार कुटुंबाशी असलेला बारामतीचा दीर्घ संबंध लक्षात घेता, अनेक नागरिक त्यांना पाठिंबा दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. “बारामतीची जनता पवार कुटुंबासोबत कायम उभी राहिली आहे,” अशी भावना अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रचारासाठी राज्यातील विविध भागांतील आमदार-मोठ्या संख्येने बारामतीत येत आहेत. सभा, बैठका आणि दौरे यामुळे प्रचाराला वेग आला आहे. मात्र, काही स्थानिक नागरिक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. “बारामतीतील मतदार सुजाण आहेत, त्यांना निर्णय घेण्यासाठी बाहेरच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे का?” असा सवाल केला जात आहे.
अजित पवार यांचे निधन झाले त्यावेळी अनेक चर्चा होत होत्या आजही रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांचा घातपात झाला असेल अशा चर्चा होत आहेत या पार्श्वभूमीवर काही नागरिकांचे मत असे आहे की, या चर्चांवर स्पष्टता आणण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येणे अधिक महत्त्वाचे आहे. “प्रचारासाठी वेळ देण्यापेक्षा या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले असते, तर अधिक योग्य ठरले असते,” अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. निवडणुकीसाठी एकत्र येण्यापेक्षा अजित पवारांचे निधन कसे झाले या प्रश्नासाठी सर्व आमदार खासदारांनी एकत्र यावे अशी बारामतीकरांची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
राजकीय समीकरणे, स्थानिक निष्ठा आणि सध्याच्या घडामोडी यामुळे बारामतीतील ही पोटनिवडणूक विशेष ठरत आहे.
एकूणच, बारामतीतील ही निवडणूक केवळ उमेदवारांपुरती मर्यादित नसून, स्थानिक स्वाभिमान, नेतृत्वावरचा विश्वास आणि बदलत्या राजकीय दृष्टिकोनाचीही परीक्षा ठरत आहे. सुनेत्रा वहिनी पवार यांना कोणत्याही प्रचाराची गरज नाही ऐतिहासिक मताधिक्याने त्या विजयी होतील अशी भावना बारामती तालुक्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे

















