संपादक – मधुकर बनसोडे.
काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या माध्यमांमधून पाहायला मिळताच बारामती तालुक्यातील पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले आणि अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवरती काही ठिकाणी गुन्हे दाखल केले तर काही ठिकाणी अवैद्य दारूचे अड्डे उध्वस्त केले.
बारामती तालुक्यात अवैद्य दारूविक्रीविरोधात पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या कारवायांमुळे अवैद्य दारू विक्रेत्यांचे ढाबे दणाणले असून “हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे का?” असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. पुण्यातील हडपसर येथे भेसळयुक्त दारूमुळे निष्पाप नागरिकांचे मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनाला जाग आली का, असा रोष व्यक्त केला जात आहे.
बारामती तालुक्यात अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे अवैद्य दारू, गुटखा, मटका आणि ऑनलाइन चक्रीसारखे धंदे उघडपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये नेहमीच होत आली आहे. अनेक वेळा नागरिकांनी 112 वर फोन करून तक्रारी दिल्या, मात्र तक्रार करणाऱ्यांची नावे थेट संबंधित अवैद्य धंदेवाल्यांपर्यंत कशी पोहोचतात? पोलिस यंत्रणेमधूनच गोपनीयतेचा भंग होतो का? असे गंभीर प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
नागरिकांचा आरोप आहे की, एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा मृत्यू झाला की प्रशासन हलते. अन्यवेळी मात्र सर्व काही “आलबेल” असल्यासारखे वातावरण निर्माण केले जाते. आज काही अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात असल्या तरी या कारवाया कायमस्वरूपी चालणार की फक्त दिखाऊ मोहिम ठरणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी शंका आहे.
“बारामतीत कायदा फक्त कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. अवैद्य धंद्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी कठोर आणि प्रामाणिक प्रशासनाची गरज असल्याची भावना व्यक्त होत असून, गृह विभागात एखादा तुकाराम मुंढे यांच्या सारखा धडाडीचा अधिकारी निर्माण होणार का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
















