जळगाव जिल्ह्यात कासवांची तस्करी करणारे तिघे वनविभागाच्या जाळ्यात

क्राईम

प्रतिनिधी

कासवांची तस्करी करताना नशिराबाद येथील तिघांना वनविभागाच्या पथकाने पकडले. याप्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद (रा. नशिराबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

शहरातील मुंबई- नागपूर महामार्गावरील कालिंकामाता मंदिराच्या पुढे कासवांची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे उपसंचालक योगेश वरकड यांना मिळाली. त्याअनुषंगाने उपवनसंरक्षक प्रवीण ए, सहायक वनसंरक्षक यू. एम. बिराजदार यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, नितीन बोरकर, वनपाल योगेश दीक्षित, संदीप पाटील, वनरक्षक भागवत तेली, अजय रायसिंग, हरीश थोरात, दीपक पाटील, गुलाबसिंग ठाकरे, भगवान चिम यांच्या फिरत्या पथकाने शहरातील कालिंकामाता मंदिराजवळ सापळा रचला. तेथे संशयास्पद वाटणार्‍या संजय कोळी, भूषण कोळी व अकबर अली मेहमूद यांची विचारपूस केली. त्यांच्याकडे तीन कासव मिळून आले. त्यांना पथकाने ताब्यात घेतले. मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई व उमेश पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. सहायक वनसंरक्षक बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर तपास करीत आहेत.