• Home
  • माझा जिल्हा
  • भूजल व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या संरपच दिपाली लोणकर यांचा समावेश
Image

भूजल व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या संरपच दिपाली लोणकर यांचा समावेश

पुणे, दि. २३: अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी दिली आहे. यात बारामती तालुक्यातील काऱ्हाटीच्या सरपंच दिपाली लोणकर यांचाही समावेश आहे.

राज्यातून दिपाली लोणकर, काऱ्हाटी (पुणे), सुधार मानकर, जरुडी, ता. वरुड (अमरावती), अमोल काटकर, किरकसाल, ता. माण (सातारा), सुनील गरड, खेड (धाराशिव), छायाताई कोळेकर, नानगोले, ता. कवठे महांकाल (सांगली) आणि शीतल झुंजारे, हरांगूल (लातूर) या वॉटर वारियर्सना दिल्ली येथे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्तादिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमाकरीता ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनपद्धतीने ग्रामस्थांनी एकजुटीने कामे करुन दुष्काळग्रस्त ते आदर्श पाणीदार गाव अशी गावाची ओळख निर्माण केली आहे. योजनेच्या प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून गावच्या परिसरात रिचार्ज शॉफ्ट, मल्चिंग, स्प्रिंकलर, शेडनेट, पॉलीहाउॅस आदी पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यात आल्या. गावातील पाण्याबाबत ‘जलसुरक्षा आराखडा’ तयार करण्यात आला.

जलसाक्षरतेबाबत कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती करण्यात आली. पर्जन्यमापक यंत्र, पिजो मीटर, वॉटर फ्लो मीटर, पाणी पातळी मोजण्यासाठी वॉटर इंडिकेटर यंत्र लावण्यात आले आहेत. भूजल माहिती केंद्र स्थापन करुन पाणी बचतीबाबत माहिती देण्यात आली. जलसंधारणाची विविध कामे करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शिवारात जिरविण्यात यश आले. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला मिळाले आहेत, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे.

*दिपाली योगेश लोणकर, सरपंच, काऱ्हाटी:* राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदावर काम करताना गावाला अटल भूजल योजनेतून दीड कोटी बक्षीस स्वीकारण्याचा मान मला मिळाला. गावाने पाण्यासाठी दिलेला आजपर्यंतचा लढा यशस्वी झाला असून त्याचे श्रेय मी माझ्या गावकऱ्यांना देते. या कामाची दखल भारत सरकारने घेतली असून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण मिळाले आहे. ही माझ्यासह ग्रामस्थाकरीता खूप मोठी उपलब्धी आहे. याबाबत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, अटल भूजल पथक, बारामती एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पाणी फाऊंडेशन, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांचे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026